मी, माझ्या मैत्रीणी आणि बकुळीची फुलं
अगं ऊठ लवकर सकाळचे ५:३० वाजलेत जायचयं ना शाळेला.
आईचे नेहमीचे संवाद सुरू झाले आणि ते मी शाळेत जायला निघे पर्यंत चालू होते. मगं अगदी ते मी घरात किती कामं करते आणि एक मुलगी म्हणून किती केली पाहिजेत इथपर्यंत....
म्हणजे सूर्योदयाच्या आधीच आमच्या घरात माझा उजेड पडलेला असतो. बरं ह्याच्यात मी मुलगी असल्याचा काय सबंध?असं मला नेहमीच वाटायचं.
असो तर एवढं सगळं करत मी शाळेत जायच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचायचे. आणि दुसरा टप्पा म्हणजे मैत्रिणींना बोलावणे. ती तर खरंच एक मजा असायची. कोकिळेच्या आधी आम्ही सगळ्या कोकिळा एकमेकांना हाक मारयचो.
फक्त एवढंच असायचा की आमच्या आणि खऱ्या कोकिळेच्या आवाजात फरक असायचा..😂😂..
आणि इथे दुसरा टप्पा संपायचा. मगं तिसरा टप्पा की आमची एक मैत्रीण जी आमच्या सोसायटीच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायची तीला बोलावणं. तिला मात्र आम्ही घरी जाऊन बोलवायचो. कारण तिची एक खासियत म्हणजे ती तयार होऊन झोपायची. आणि आम्ही हाका मारल्या की मग ती उठायची. बरं हे सगळं आम्ही पंधरा मिनिटात करायचो.
जर का आमच्या वेळी hurdle race असती ना तर कदाचित आम्हीच जिंकलो असतो.
एवढं सगळं झाल्यावर आमच्या मैत्रिणींमध्ये दोनच महत्वाचे विषय असायचे ते म्हणजे एक की शाळेत जायच्या रस्त्यावर कुत्रे आले तर कोण पुढे उभं राहून नेतृत्व करणार?🤔 कारण कुत्रा आणि आम्ही हे समीकरण काहिकेल्या सुटलं नाही. एकवेळ भूमिती मधील समीकरण सुटायची खात्री तरी होती पण हे समीकरण🤷😂.. असो....आणि दुसरा विषय म्हणजे शाळा सुटल्यावर बकुळीची फुलं गोळा कोण करणार आणि त्या झाडाला जोरजोरात हलवणार कोण?
आणि महत्वाचं फुलांच समान वाटप कोण करणार?
बकुळीची फुलं त्यावेळी आमचा weak point होता. त्याचा रंग, त्याला येणारा सुवास आणि नंतर त्याचा तयार केलेला गजरा... अहहा... आणि ती फुलं त्यावेळी आम्ही शाळेच्या uniform च्या खिश्यात भरून घेऊन जायचो. खूप मजा यायची....
बरं ती फुलं आम्ही दुसऱ्या सोसायटी मधून आणायचो. पहिल्यांदि आम्हाला त्या सोसायटी मधले काही बोलायचे नाहीत. पण मगं मात्र त्या सोसायटीचा वॉचमन आला रे आला की आम्ही पळायचो.. पण दुसऱ्या सोसायटी मध्ये असल्यामुळे आम्हाला "भाग मिल्खा भाग" असं म्हणणार कोणीच नव्हतं. उलट "सांगतो तुमच्या पालकांना सांगतो" असं म्हणणारे बरेचं होते😂😂.. ते तर म्हणा आमच्या सोसायटी मधले पण म्हणायचं... असं सगळं करत ती बकुळीची फुलं जेव्हां आम्ही हातात घ्यायचो तेव्हां आम्हाला पद्मश्री मिळाल्याचा अनुभव यायचा... आणि जोमाने आम्ही उद्याचा प्लॅन मनातल्या मनात करायला लागायचो....
म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...
बकुळीसारख्या आठवणी
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete